राष्ट्रवादी-भाजप "भाऊ भाऊ', मग स्वच्छता कोण करणार ? 

राष्ट्रवादी-भाजप "भाऊ भाऊ', मग स्वच्छता कोण करणार ? 

कोल्हापूर : राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सहकार खाते आले. त्यावेळी त्यांनी सहकारातील अपप्रवृत्ती मोडून काढण्याचा इशारा दिला होता, पण राज्यात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी संस्थांवर त्यांचे वर्चस्व नव्हते, कदाचित त्यामुळेच गेल्या तीन वर्षात त्यांना हे काही शक्‍य झाले नसेल. पण आता बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे सहा संचालक निवडून आलेत, त्यांच्यामार्फत त्यांनी या कारखान्यापासून सहकारातील स्वच्छता करण्यास सुरूवात करावी, असा सूर आळवला जात आहे. 

"बिद्री' च्या निमित्ताने जिल्ह्यात पहिल्यांदाच भाजपाचा सहकारी संस्थेत प्रवेश झाला आहे. जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे, त्याच राष्ट्रवादीसोबत भाजपाने "बिद्री' च्या निवडणुकीत आघाडी केली होती. राज्यात भाजपा सत्तेत आल्यानंतर श्री. पाटील यांचे पहिले "टार्गेट' होते ते राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ हेच. श्री. मुश्रीफांना अध्यक्ष होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न श्री.पाटील यांनी केला, त्यासाठी प्रसंगी कॉंग्रेसला सहकार्य करण्याची भुमिकाही त्यांनी घेतली. पण ऐनवेळी माजी मंत्री विनय कोरे हे श्री. मुश्रीफ यांच्या मदतीला धावले. त्यानंतर श्री. पाटील यांनी संधी मिळेल तिथे श्री. मुश्रीफ यांना अडवण्याचा प्रयत्न केला. 

राजकारणात दादांपेक्षा जास्त दिवस काढलेल्या श्री. मुश्रीफ यांनीही त्यांच्यावर तोफ डागण्यास सुरूवात केली. नोटबंदीच्या काळात जिल्हा बॅंकेत नोटांची मोठी अफरातफर झाल्याचा आरोप श्री. पाटील यांनी केला. त्यातून श्री. मुश्रीफ हेच त्यांचे टार्गेट होते, पण श्री. मुश्रीफ यांनी "पार्श्‍वनाथ' चे नाव काढतातच दादा शांत झाले. गेल्या तीन वर्षात एकमेकांवर संधी मिळेल तिथे टीका करणारे हे दोघेच "बिद्री' त गळ्यात गळा घालून फिरू लागले. कोणत्याही मार्गाने सत्तेत जायचे हे भाजपाचे अलिकडचे सुत्र आहे, मग संगत कोणाबरोबर का असेना हाच संदेश यातून दिला गेला. भाजपाचे कागल, भुदरगडमधील नेते हाताला लागावेत यासाठी राष्ट्रवादीनेही त्यांना सोबत घेतले. त्यातून या दोघांची आघाडी निर्विवाद सत्तेत आली. 

आता खरी परीक्षा आहे ती भाजपाच्या संचालकांची. त्यांचे संचालक आहेत सहा, त्यात मुश्रीफ यांचे नेतृत्त्व मानणारे तीन, दोन के. पीं. चा शब्द ऐकणारे अशा परिस्थिती कारखान्यातील एखाद्या गैरव्यवहाराला हे संचालक विरोध करतील का ? कारखाना हिताआड येणारा निर्णय ते रोखतील का ? हा प्रश्‍न आहे. विरोधी पक्षातील एखादा सत्तेत गेला तर तो सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर कधी जाऊन बसतो हे कळत नाही. भाजपाच्या या सहा संचालकांचेही असे होऊ नये एवढीच अपेक्षा. त्यातून दादांना सहकारातील स्वच्छता करण्याचे काम सोपे होईल, अन्यथा "आम्ही सारे भाऊ भाऊ' असे झाल्याशिवाय रहाणार नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com