मुंबईकडे चाललेल्या `लाल वादळा'चा `चक्का जाम'चा इशारा

अखिल भारतीय किसान सभेचा "लॉंग मार्च' भिवंडीत काही काळ विसावल्यानंतर सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने सरकला.
मुंबईकडे चाललेल्या `लाल वादळा'चा `चक्का जाम'चा इशारा

भिवंडी : अखिल भारतीय किसान सभेचा "लॉंग मार्च' भिवंडीत काही काळ विसावल्यानंतर सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने सरकला. 

कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, वनहक्क कायदा अंमलबजावणी, दुष्काळग्रस्त शेतीला पाणी, प्रकल्पातील भूसंपादन याबाबतच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचा "लॉंग मार्च' दुपारी 1.30 वाजता भिवंडीत धडकला. त्यानंतर हे "लाल वादळ' मुंबईच्या दिशेने निघाले आहे. 

दरम्यान, तळपत्या उन्हाचा त्रास झाल्याने अनेक शेतकऱ्यांना चक्कर आली. मोर्चेकरी सोनाळे गावच्या मैदानात तंबू टाकून क्षणभर विसावले. या वेळी अखिल भारतीय किसान सभेतील आमदार जे. पी. गावित, डॉ. अजित नवले यांनी मागण्या मान्य न झाल्यास मुंबईच "चक्का जाम' करू, असा इशारा दिला आहे. 

नाशिकहून शहापूरमार्गे निघालेला हा "लॉंग मार्च' भर दुपारी भिवंडीतील सोनाळे ग्रामपंचायतीच्या मैदानावर आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी चुली थाटून दुपारचे जेवण शिजवली. मध्यान्न भोजनानंतर त्यांनी येथील सावलीत विसावा घेतला. तब्बल 30 हजार मोर्चेकरी सहभागी झाल्याचा दावा किसान सभेने केला आहे. यात मुंबईत 50 हजार शेतकरी राज्याच्या विविध भागांतून सहभागी होतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. 

जे. पी. गावित यांनी माहिती देताना सांगितले, "सरकारने शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती; मात्र 10 ते 15 टक्के शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळाला नाही. नदीजोड प्रकल्पाचा प्रश्‍न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, रेशनकार्डचे नूतनीकरण, इंधन किमतीवर नियंत्रण आदी मागण्या सरकारसमोर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शरद पवारांची भेट 
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकला जाताना पडघा येथे मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे या वेळी सांगितले. 

50 जणांना उष्माघाताचा त्रास 
लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेल्यांपैकी किमान 50 ते 60 मोर्चेकरी उष्माघाताने भोवळ येऊन पडले आहेत. त्यांच्यावर शेतकरी किसान सभेच्या मेडिकल कॅम्पमध्ये उपचार सुरू होते. उन्हामुळे चक्कर येणे, मळमळणे, अंगदुखी आदी व्याधींचा सामना त्यांना करावा लागत होता. 

भिवंडी तहसील कार्यालयातर्फे मोर्चेकऱ्यांना पाणी, तर लालबावटा सीटू युनियनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धान्य आणि इतर साहित्य दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com