टोलनाक्‍यासाठी काय भांडताय ? छत्रपतींच्या परंपरेतील संघर्ष करा ! 

श्रमिक मुक्ती दलाने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर येत्या 24 ऑक्‍टोबरला मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. पण सध्या सुगीचे दिवस आणि पावसाळी वातावरण असल्याने हे आंदोलन तुर्त स्थगित केले असून आता हे आंदोलन 14 नोव्हेंबरला होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी यापूर्वी घेतलेले कर्ज रद्द करावे, तसेच पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी आम्ही दिलेल्या उपाय योजना कराव्यात आदी मागण्या केल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.
टोलनाक्‍यासाठी काय भांडताय ? छत्रपतींच्या परंपरेतील संघर्ष करा ! 

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी जनतेचे मुद्दे घेऊन उठाव करायला हवा. टोलनाक्‍यासारख्या किरकोळ गोष्टीत लक्ष घालून ठेकेदारांच्या पातळीवरील भांडणात ते सहभागी झालेत. मुळात छत्रपतींच्या परंपरेत बसणारा हा संघर्ष नाही. त्यामुळे दोघांनी हा प्रकार थांबवून छत्रपतींच्या तत्वावर व मुद्‌द्‌यांवर पुढे वाटचाल करावी, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केले. 

डॉ. पाटणकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील जनतेला छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे आणि शंभूपुत्र शाहू महाराज यांच्या दैदिप्यमान परंपरा लाभली आहे. छत्रपतींच्या परंपरेत जीव खाऊन संघर्ष करायचा असेल तर तो परंपरेत बसणारा असावा. छत्रपतींनी सरमंजामशाही, जमीनदारी नष्ट केली. ही परंपरा पुढे नेण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दोन्ही राजांनी संघर्ष करायला हवा. मुळात छत्रपतींच्या वंशजांनी महाराष्ट्र संघटीत करायला हवा, पक्ष बघून चालणार नाही. महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ यावर नवा पर्याय घेऊन पुढे आले तर महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने जनता त्यांच्यासोबत येईल. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करायला हवे. जनतेचे मुद्दे घेऊन उठाव करायला हवा. हे सर्व आता सातारकर जनतेने त्यांना सांगायला हवे. अन्यथा अशा संघर्षात जनताही भरडत जाणार आहे.

केवळ छत्रपतींच्या दैदिप्यमान परंपरेविषयी आदर म्हणून जनता मते देते. अन्यथा जनतेला प्रतिनिधीत्व करण्याची वेळ आणू नका, असा इशारा देत डॉ. पाटणकर म्हणाले, दोघांनीही हा प्रकार थांबविण्याचा निर्णय घेतला तर श्रमिक मुक्ती दल त्यांच्यासोबत असेल. मुळात टोलनाके नको होते. कारण वाहनांचा कर भरला जातो, त्यातूनच रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीची कामे व्हायला हवीत. ती संबंधित कंपनीकडून होत नाहीत, तरीही टोल वसुली होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
यावेळी चैतन्य दळवी, संतोष गोटल, यशवंत लावंड, जयसिंग कदम, आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com