साहेब म्हणाले ,असं काम करा , की लोकांनी नाव काढलं पाहिजे :  खा. श्रीरंग बारणे

विरोधकांच्या बोलण्यावर लक्ष ठेवून मग त्यांचा समाचार घेण्याचा मूलमंत्रही त्यांनी दिला
Shrirang-Barne-with-THakre
Shrirang-Barne-with-THakre

पिंपरीः शिवसैनिकाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्याचा उत्साह वाढविणाऱ्या बाळासाहेबांचे अगदी बारीकसारीक गोष्टींवर लक्ष असे, याची आठवण शिवसेनेचे मावळचे (जि.पुणे) खासदार श्रीरंगअप्पा बारणे  यांनी सांगितली.विरोधकांच्या बोलण्यावर लक्ष ठेवून मग त्यांचा समाचार घेण्याचा मूलमंत्रही त्यांनी दिला असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त बारणे यांनी आपल्या या सर्वोच्च नेत्याच्या आठवणींचा जागर केला. 'असं काम करायचं, की लोकांनी नाव काढले पाहिजे', हे बाळासाहेबांचे शब्द अजूनही विसरलेलो नाही,  त्यानुसारच वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले,"2009 पासून  सहा सात वेळा  झालेल्या बाळासाहेबांच्या सर्व भेटी या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे झालेल्या आहेत." 

"2009ला आमची पहिली भेट झाली. त्यावेळी 'मातोक्षी'वर अर्धा तास गप्पा रंगल्या.त्यापूर्वी त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. विरोधकांचेही कसे ऐकले पाहिजे, हे त्यांनी सांगितले. तसेच विरोधकांवर लक्षही ठेवण्याची गरजही त्यांनी त्यावेळी प्रतिपादित केली. "

त्याचे उदाहरण म्हणून त्यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा होणाऱ्या मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या इंदिरा गांधीच्या सभेचे उदाहरण दिले."ही सभा मी पूर्ण पाहिली व ऐकली. नंतर दुसऱ्या दिवशी 'सामना'त गांधींच्या भाषणाची चिरफाड केली. पण त्यासाठी विरोधक काय बोलतात,त्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे'', असे बाळासाहेबांनी या भेटीत सांगितले होते, असे बारणे म्हणाले.

12 जुलै 2012 म्हणजे बाळासाहेबांच्या निधनाच्या चार महिने अगोदर शेवटची आठवणही बारणेंनी सांगितली.ते म्हणाले, "त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. भेटणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होतं. पण पुन्हा एकदा उद्धवजींमुळे बाळासाहेबांची पुन्हा भेट झाली. दुर्दैवाने ती अखेरची ठरली. नेहमीच्या आस्थेने ते भेटले. चौकशी केली. चहा दिला. फोटोही काढले. एवढेच नाही,तर काढलेले फोटो मला पाठविण्याबाबत फोटोग्राफरला निक्षून बजावलेही. अतिशय मोठ्या मनाचा हा मोठा माणूस होता."

" शिवसैनिकांना मोठे स्थान त्यांच्या मनात होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर बाळासाहेबांना भेटायला गेल्याचा प्रसंगही बारणेंनी सांगितला. त्यावेळी असं काम केलं पाहिजे, की लोकांनी नाव काढलं पाहिजे,असे ते म्हणाले होते. त्यांनी हा दिलेला मूलमंत्रच नंतर आतापर्यंत पाळत आलो आहे, असे बारणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com