मराठी बोलणारे "पीएम' 

मराठी माणूस आजपर्यंत देशाचा पंतप्रधान होऊ शकला नाही याचे शल्य मराठी मनाला आहे. पण, गेल्या साठ सत्तर वर्षात देशाला जे पंतप्रधान म्हणून लाभले त्यापैकी अटलबिहारी वाजपेयी आणि नरसिंहराव या दोन माजी पंतप्रधानांना मराठी चांगले येत होते. ते मराठी बोलत होते. याचा अभिमान नक्कीच मराठी माणसाला आहे.
मराठी बोलणारे "पीएम' 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान नरसिंहराव हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. पंतप्रधान झाल्यानंतरच ते आंध्रप्रदेशातून मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले होते. त्यांच्याप्रमाणेच कॉंग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे ही वाशीम लोकसभा मतदारसंघातून निवडून येत होते. राव हे मूळचे आंध्रप्रदेशचे तर आझाद हे जम्मू-काश्‍मीरचे. पण, खासदार म्हणून ते दोघेही महाराष्ट्रातून निवडून येत. दिल्लीत हे दोघेही महाराष्ट्राचे खासदार म्हणून ओळखले जात. 

वाजपेयींचे तसे नाही. ते महाराष्ट्रातून कधीच निवडून आले नव्हते. परंतु, वाजपेयींचे मराठीवर प्रेम होते. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आणि येथील संत परंपरेवर ते भरभरून बोलत. महाराष्ट्र ही संतांची आणि शुरांची भूमी आहे हे वाक्‍य अटलजींच्या भाषणात ऐकण्यास मिळत असे. वाजपेयींचे महाराष्ट्रात कोठेही भाषण असेल तर मराठीचा उल्लेख केल्याशिवाय ते आपले भाषण संपवत नसंत. 

भाजपमधील वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी ही जोडी पक्षाचे शक्तीस्थळ होते. अडवानींचे विशेषत: इंग्रजी आणि हिंदीतच भाषण होत असे. माजी आमदार अरविंद लेले यांच्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अडवानी हे पुण्यात आले होते. त्यावेळी ते जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा अडवानी म्हणाले, "" मी हिंदीतच बोलणार आहे. मी महाराष्ट्रात आहे. खरेतर मला मराठी बोलता येत. पण, अटलबिहारी वाजपेयी हे चांगले मराठी बोलतात. त्यांना चांगले मराठी येते.'' वाजपेयींना मराठी येते याचा आनंद अर्थात अडवानींना होता. 

दुसरा कार्यक्रम मुंबईतले होता. संत रोहिदास याच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला अटलजी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम होता. त्यावेळी नितीन गडकरी तेथे उपस्थित होते. आयोजकांनी गडकरींना भाषणासाठी निमंत्रित केले असता गडकरीनी माईक हातात घेतला आणि ते म्हणाले,"" तुम्ही अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात. त्यामुळे मी तुमचा वेळ घेत नाही. माझ्या या कार्यक्रमाला शुभेच्छा आहेत. माझे भाषण संपले.'' त्यावेळी श्रोत्यांनी गडकरींना प्रतिसाद दिलाच पण, त्यानंतर वाजपेयींनी संत रोहिदास यांच्यावर केलेले भाषण आठवते. त्या भाषणातही अटलजींनी मराठी संतानी केलेल्या कार्याचा उल्लेख करीत मराठीचे मोठे सांगितले. मराठी भाषा किती गोड आहे हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. 

वाजपेयींप्रमाणे मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असलेले दुसरे पंतप्रधान म्हणजे नरसिंहराव. ते अनेक वर्षे महाराष्ट्रातूनच निवडून येत असल्याने त्यांना चांगले मराठी येत असावे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कृष्णाकाठच्या कराड भूमीत मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्‌घाटन नरसिंहराव यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी राव यांनी मराठीत केलेले भाषण तर मराठी माणसाला कदापि विसरता येणार नाही. महाराष्ट्राचे नसताना. मराठी मातृभाषा नसताना या दोन्ही पंतप्रधानांना चांगले मराठी येत होते हे प्रत्येक मराठी माणूस कदापि विसरू शकत नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com