नवी मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेत दुसऱ्या दिवशीही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी तूर्त भाईंदर खाडीतील शोध मोहीम थांबविली आहे.
मात्र ही शोध मोहीम पुन्हा नव्या पद्धतीने सुरू करणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. ही शोध मोहीम कधी सुरू होणार, याबाबत स्पष्टता केलेली नाही.
अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून मंगळवारी (ता. 16) भाईंदरच्या खाडीत पुन्हा शोध मोहीम हाती घेतली होती. एका खासगी कंपनीने मॅग्नोमीटरच्या साह्याने लोखंडसदृश वस्तू असलेली नऊ ठिकाणे निश्चित केली होती.
त्यात दोन मुख्य ठिकाणांवर नवी मुंबई पोलिसांनी मॅग्नोमीटरच्या साह्याने शोध मोहीम सुरू केली होती. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नेव्हीच्या पथकासह खासगी कंपन्यांचे पाणबुडे, फॉरेन्सिक विभागाच्या पथकाची मदत घेतली होती.
खाडीतील गाळात पहिल्या दिवशी एका प्लास्टिकच्या गोणीत तलवार सापडली. यामुळे पोलिसांनी पुन्हा त्याच ठिकाणी ग्रॅडीओमीटरच्या साह्याने तपासणी केली. सायंकाळपर्यंत शोध सुरू होता; मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी पोलिसांनी खाडीतील शोध मोहीम तूर्तास थांबविली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.