बड्या भांडवलदारांची थकबाकी हाच मोठा प्रश्न : जेटली 

बड्या भांडवलदारांची थकबाकी हाच मोठा प्रश्न : जेटली 

पुणे : बड्या भांडवलदारांची बॅंकांमधील थकबाकी हा देशापुढील मोठा प्रश्‍न आहे. त्यांच्याकडून हे कर्ज वसुलीचे आव्हान सरकार समोर असून या बॅंका अडचणीत आलेल्या आहेत,' अशी कबुली देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी दिली. बॅंका सक्षम राहिल्या, तरच देशाच्या विकासाला चालना मिळू शकते, असेही ते यावेळी म्हणाले. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शताब्दी सांगता सोहळ्यात जेटली बोलत होते. यावेळी माजी कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, माजी मंत्री अजित पवार, दिलीप वळसेपाटील, बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोसले यांच्यासह आजी-माजी संचालक आणि खातेदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे कौतुक करून जेटली म्हणाले," बॅंका आणि खातेदार यांच्या नाते विश्‍वासाचे असलेले पाहिजे. बॅंकेने विश्‍वासार्हता गमावली, तर शेतकऱ्यांना खासगी सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय राहू शकत नाही. छोटे शेतकरी हे प्रामाणिकपणे कर्ज फेडतात. त्यामुळेच जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील 42 टक्के बॅंक खाते नसलेल्यांना बॅंक ांशी जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे आर्थिक समावेशकता निर्माण होण्यास मदत झाली. या उलट मोठे भांडवलदार कर्ज फेडत नाहीत. ते कर्जाच्या रशीवर बसून आहेत. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडून देखील सक्तीने वसुलीचे धोरण अवलंबले आहे. बॅंका सक्षम झाल्या तर देशाच्या विकासाला चालना मिळू शकते.'' 

यावेळी शरद पवार म्हणाले, ""ग्रामीण भागातील गरजेतून सहकारी बॅंकांचा जन्म झाला. नैसर्गिक आणि आर्थिक आरिष्ट असून देखील शेतक री डगमगला नाही. परंतु सध्याची परिस्थिती पाहता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकारसोबतच केंद्राने उभे राहावे. नोटाबंदीचा सर्वांत जास्त फटका ग्रामीण भागाला बसला. त्यामुळे जिल्हा बॅंकेतील दहा टक्के रक्कम तातडीने जमा करून घेऊन जिल्हा बॅंकांचे होणारे नुकसान टाळावे.'' 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष देशमुख, अजित पवार यांची भाषणे झाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्मरणिकांचे प्रकाशन झाले. तर पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जेटली यांच्या हस्ते शरद पवार यांच्या विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मोबाईल बॅंकिंग व्हॅनचे उद्घघाटनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय भोसले यांनी, तर स्वागतपर भाषण रमेश थोरात यांनी केले. उपाध्यक्षा अर्चना गाडे यांनी आभार मानले. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com