अनुराधा चव्हाण यांच्यासाठी " दिवाळी पहाट ' लाभदायक ठरणार ?

 अनुराधा चव्हाण यांच्यासाठी " दिवाळी पहाट ' लाभदायक ठरणार ?

फुलंब्री : आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून शिवसेनेच्या विरोधात भाजपकडून बागडे अस्त्र वापरण्याचा विचार पक्षश्रेष्ठींकडून सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर बागडेंच्या जागी फुलंब्रीतून कोण लढणार? यासाठी भाजपमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या अनुराधा चव्हाण यांचे नाव त्यात आघाडीवर आहे. दिवाळी निमित्त औरंगाबादेत त्यांनी घेतलेला "दिवाळी पहाट' हा सुरेल कार्यक्रम त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी लाभदायक ठरणार का? याची चर्चा आता भाजपमध्ये सुरू झाली आहे. 

फुलंब्री आणि औरंगाबाद या दोन तालुक्‍यात विभागलेला हा विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. नुकत्याच झालेल्या दिवाळीमध्ये विधासभा लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक व सर्वपक्षीय विद्यमान लोकप्रतिनिधींकडून शहरात "दिवाळी पहाट' कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे आमदार अतुल सावे, राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण हे यात आघाडीवर होते. 

फुलंब्री विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या अनुराधा चव्हाण यांनी देखील नुकताच "स्वरानुभूती' दिवाळी पहाट हा कार्यक्रम घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी त्यांनी आपले गॉडफादर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि फुलंब्रीचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांना आमंत्रित करत या दोन्ही नेत्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. 

अनुराधा चव्हाण यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीकडून फुलंब्री विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु पक्षांतर्गत नाराजी आणि नेत्यांनीही पाठ फिरवल्यामुळे त्यांचा पराभव झाला. पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्यानंतरही चव्हाण यांना 32 हजार मते मिळाली होती. याचा थेट फायदा भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांना झाला आणि त्यांनी कॉंग्रेसच्या कल्याण काळे यांचा पराभव केला. 

निवडणुकीत पराभव होताच अनुराधा चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर खापर फोडत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनीच अनुराधा चव्हाण यांना भाजपमध्ये आणल्याचे बोलले जाते. पक्षात घेतांना त्यांना 2019 मध्ये फुलंब्रीतून उमेदवारी देण्याचा शब्द देखील देण्यात आल्याची चर्चा आहे. 2017 मध्ये भाजपने अनुराधा चव्हाण यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती. तेव्हा प्रतिस्पर्धी उमेदवाराविरूध्द त्यांनी एकहाती विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली होती. तेव्हापासून विधानसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. दरम्यान, उपमहापौर विजय औताडे यांच्या रुपाने चव्हाण यांना पक्षातून आणखी एक स्पर्धक निर्माण झाला. 

शिवाय हरिभाऊ बागडे यांनी देखील पुढचा आमदार मीच असणार असे एका कार्यक्रमात जाहीर केल्यामुळे इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. शिवसेना-भाजप यांच्यातील वाढती दरी पाहता आगामी निवडणुकीत हे पक्ष एकत्रित निवडणुका लढवण्याची शक्‍यता कमी असल्याचे बोलले जाते. जर हीच परिस्थीती निवडणुका जाहीर होईपर्यंत कायम राहिली तर मात्र बागडेच फुलंब्रीतून लढण्याची शक्‍यता आहे. अशावेळी भाजपमधील इतर इच्छूकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाईल. 

रावसाहेब दानवे यांच्या मर्जीतील अशी ओळख असलेल्या अनुराधा चव्हाण यांनी मात्र आपल्यालाच उमेदवारी मिळणार हे गृहित धरून मतदारसंघातील भेटीगाठी आणि कार्यक्रमांवर जोर दिला आहे. महापालिकेतील आठ वॉर्ड फुलंब्री मतदारसंघात येतात हे ध्यानात ठेवूनच शहरात त्यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाकडे देखील निवडणूकीच्या तयारीचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com