आंबेगावाची साथ कोल्हेंना राहणार; दहा हजाराचे लिड भेटणार : निकम

आंबेगावाची साथ कोल्हेंना राहणार; दहा हजाराचे लिड भेटणार : निकम

मंचर : आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी -कॉंग्रेस कॉग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना किमान दहा हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल. शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. कोल्हे घासून नव्हे तर ठासून मतांनी विजयी होतील. असा विश्वास शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख व मंचर बाजारसमितीचे सभापती देवदत्त निकम यांनी व्यक्त केला आहे.

 निकम म्हणाले, "शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या १५ वर्षात विकास कामे करण्याऐवजी विमानतळा सारख्या अत्यंत महत्वाच्या व विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील तरुणांचा रोजगार बुडाला आहे. विमानतळ झाले असते तर आंबेगावच्या विकासात भर पडली असती. पुणे- नाशिक रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले. मंचर, कळंब येथील बाह्यवळणाचे काम झाले नाही. पुणे- नाशिक रेल्वे सुरु होणार असे प्रत्येक निवडणुकीत आढळराव जाहीरनाम्यात सांगतात. पण कृती मात्र नाही. फक्त घोषणाबाजी करून ते अमाप प्रसिद्धी करत असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. तसेच न झालेल्या कामाचे खापर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यावर ते फोडत आहेत.

पाच वर्ष राज्यात व केंद्रात त्याचे सरकार होते. पण तरुणांना रोजगार देणारा एकही कारखाना उभा करता आला नाही. बैलगाडा शर्यत सुरु न झाल्याने बैलगाडाप्रेमी नाराज होते. तसेच त्यांनी अमेरिकेचे बराक ओबामा, शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांना निवडणुकीत माझ्या समोर उभे राहा. असे आवाहन दिले होते. त्यातून आढळराव यांचा अहंकार व झालेला गर्व जनतेच्या लक्षात आला. त्यामुळे जनतेत त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी होती, असे निकम यांनी सांगितले.

दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंगेस या पक्षातील सर्व प्रमुख नेते व कार्यकर्त्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्याचा चांगला फायदा झाला. सर्व कार्यकर्त्ये एकदिलाने काम करत होते. सोशल मिडिया व कोपरा सभांचे व्यवस्थित नियोजन केले होते. शेतीमालाचे व दुधाचे घसरलेले बाजारभाव, कर्जमाफीचा उडालेला बोजवारा हे प्रश्नही आढळराव यांना अडचणी निर्माण करणारे होते. छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास समाजासमोर आणण्याचे काम डॉ. कोल्हे यांनी केले. घराघरात स्वागत होत असलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' हि मालिका बंद करा. अशी मागणी निवडणूक आयोगाकडे आढळराव पाटील यांच्या जवळच्या शिवसेना कार्यकर्त्याने केली होती. तसेच डॉ. कोल्हे यांच्या जातीचा प्रश्नही उपस्थित केला होता. त्याचा अनिष्ठ परिणाम आढळराव यांच्या मतदानावर होणार आहे,असा दावा त्यांनी केला.

``महिला व युवकांमध्ये डॉ. कोल्हे यांची लोकप्रियता आहे. तसेच सातारा लोकसभा मतदार संघातून खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवा असा दबाव डॉ. कोल्हे यांच्यावर शिवसेनेचा होता. पण छत्रपतींच्या गादीशी मी बेईमानी करणार नाही. असे डॉ. कोल्हे यांनी शिवसेना सोडण्यामागचे कारण राजगुरुनगरच्या जाहीर सभेत सांगितले. त्याचाही मराठी मनावर चांगला परिणाम झाला. डॉ. कोल्हे यांची सहानुभूती वाढली. त्यांच्या सर्व सभांना भर दुपारी व रात्री उशिरापर्यंत गर्दी होत होती. या उलट आढळराव यांच्या सभांना आंबेगाव मध्ये कोठेही गर्दी झाली नाही. शिरूर तालुक्यातील ३९ गावे आंबेगावला जोडली आहेत. तेथे डॉ. कोल्हे यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. या सर्व बाबी लक्षात घेता. आंबेगाव मधून डॉ. कोल्हे यांना मताधिक्य मिळेलच,``असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com