माण-खटावमधून जयकुमार गोरेंना हटविण्याची सर्वपक्षीय नेत्यांची शपथ!

माण-खटावमधून जयकुमार गोरेंना हटविण्याची सर्वपक्षीय नेत्यांची शपथ!

सातारा : माण-खटाव मतदारसंघाच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती थोपविण्यासाठी माण व खटाव तालुक्‍यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आज (सोमवार) साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये एकत्र आले. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून गोरे बंधू हटावची शपथ घेतली.

याबैठकीस भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुभाष नरळे यांच्यासह तालुक्‍यामधील विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे नेते व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे कामानिमित्त बाहेर गावी असल्याने ते या बैठकी उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगण्यात आले.

आमदार गोरेंनी लोकसभा निवडणुकीपासून घेतलेली भुमिका आणि भाजपसोबत सुरू ठेवलेली जवळीक यातून संतप्त झालेल्या माण, खटावमधील नेत्यांचा आज उद्रेक झाला. त्यांनी आमदार गोरेंविरोधात आघाडीच उघडली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी जवळीक साधून उरमोडी, जिहे-कठापूर आणि टेंभू या योजनेसंदर्भात विविध प्रश्‍न मार्गी लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. यातून माण, खटावमधील भाजपच्या नेत्यांत संघर्ष पेटला आहे.

माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी सुरवातीपासून पाणीप्रश्‍नांवर आंदोलने केली. आता आमदार जयकुमार गोरेंनी भाजपच्या मंत्र्यांशी जवळीक साधत हा प्रश्‍न आपल्या हातात घेतल्याने हे सर्व नेते मंडळी संतप्त झाली आहेत. आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रत्येकाने आपापल्या परिने आमदार गोरेंविरोधात टीकेची झोड उठविली.

यावेळी बोलताना डॉ. दिलीप येळगांवकर म्हणाले, गेल्या 20 वर्षांत माण तालुक्‍यातील विकास रखडला आहे. त्याविरोधात आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. आम्ही व्यक्ती द्वेषातून एकत्र आलेलो नाही. मतदारसंघाचा रखडलेला विकास या एकमेव मुद्‌द्‌यावर आम्ही एकत्र आलो आहोत. माण मतदारसंघाला एक इतिहास आहे. याला छेद देण्याचे काम आमदार गोरे करत आहेत. आजपर्यंत गोरे बंधूंनी तालुक्‍यात गुंड प्रवृत्तीला चालना दिली आणि गुंडगिरीचे राजकारण आणले आहे. यामुळे तालुक्‍याच्या विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्तीस थोपविण्याचा आम्ही निर्धार केला आहे. गोरे बंधूंना हटविणे हेच आमचे ध्येय आहे. आमदार गोरेंच्या विरोधाच्या लढ्यात तालुक्‍यातील अनेकजण सहभागी होऊ इच्छितात. आगामी काळात आम्ही आपापल्या पक्ष नेतृत्वास भेटून याबाबतची माहिती देणार आहोत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. या एकीतून विधानसभा निवडणुकीसाठी आमच्यामधील एकच उमेदवार असेल, असे ही डॉ. येळगावकर यांनी नमूद केले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात माण - खटावला पाणी देणाऱ्या 50 टक्के योजना ठप्प झाल्या. जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी जिहे कठापूरसह अन्य योजनांना गती दिली. उरमोडीचे पाणी आले नाही तर मी विधानसभा निवडणुक लढविणार नाही अशी वल्गना आमदार गोरे यांनी केली आहे. खरं तर हे पाणी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आले आहे.

रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर म्हणाले उत्तर माणच्या 32 गावांना दहा वर्षांत त्यांना पाणी देता आले नाही. त्यांनी (गोरे व खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर) यांनी आंधळी धरणाच्या येथे बोअरवेल घेऊन पाणी देण्याचा कार्यक्रम केला. ही जनतेची घोर फसवणुक केली आहे. 

आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे तुमच्यासोबत येणार आहेत का, असे विचारले असता त्यांच्याशी आमची चर्चा झालेली नाही. ते स्वत: हून आलेच तर आम्ही स्वागत करु. मात्र त्यांनी उमेदवारीची अपेक्षा ठेवून येऊ नये असे डॉ. येळगावकर यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com