शेतकरी आत्महत्या हा शब्दप्रयोग आता ठरणार गुन्हा : अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा फतवा

शेतकरी आत्महत्या हा शब्दप्रयोग आता ठरणार गुन्हा : अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा  फतवा

अकोला : शेतकरी आत्महत्या या शब्दाचा समाज मनावर होणारा विपरीत परिणाम थांबविण्यासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी यापुढे बैठकांमध्ये शेतकरी आत्महत्या हा शब्दप्रयोग टाळण्याचा फतवाच जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. या शब्दाच्या दुष्परिणामुळे शेतकरी आत्महत्या हा शब्दप्रयोग न करता याला पर्यायी शब्द म्हणून आत्मघाती निधन असा शब्दप्रयोग करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे बैठकांमध्ये शेतकरी आत्महत्या हा शब्दप्रयोग केल्यास संबंधित शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा गुन्हा ठरणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

निसर्गाची अवकृपा, डोक्‍यावर असलेला बॅंक, सावकारांचा कर्जाचा डोंगर आणि आर्थिक अडचणीमुळे कुटुंबाच्या पालणपोषणाची जबाबदारी पेलणे अशक्‍य होत असल्याने राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतच आहे. गत दहा-पंधरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या हा शब्दप्रयोग समाजनावर विपरीत परिणाम करीत आहे. त्यामुळे या गंभीर विषयावर सकारात्मकतेने पुढाकार घेत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावले आहे.

जिल्ह्यात रूजू झाल्यानंतर अनेक बैठकांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी आत्महत्या हा शब्द अनेकदा ऐकण्यास मिळाला. मात्र, सामाजिक मानसशास्त्राचा विचार करता वारंवार होणारा शेतकरी आत्महत्या हा शब्दप्रयोग समाजमनावर विपरीत परिणामच करीत आहे. एकप्रकारे नैराश्‍याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये जगण्याची नवीन उमेद निर्माण न करता त्यांच्या मनावर असे शब्दप्रयोग करून संकटावर मात करण्याऐवजी त्यांना अधिक नैराश्‍यग्रस्त करण्यास प्रवृत्त केल्या जात आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या हा गंभीर प्रकार थांबविणे ही प्रत्येक सुजाण नागरिकांची जबाबदारी आहे. या संकल्पनेतून अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शासकीय कामकाजात शेतकरी आत्महत्या हा शब्दप्रयोग बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

शेतकऱ्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देणे, स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते. यादृष्टीनेच प्रशासकीय यंत्रणेने अधिक जोमाने काम करावे. तसेच लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमे, सामाजिक संघटनांसह सर्व समाजघटकांनी शेतकऱ्यांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com