कोण काय खातंय, कोण काय घालतंय याकडेच सरकारचं लक्ष : अजित पवार 

कोण काय खातंय, कोण काय घालतंय याकडेच सरकारचं लक्ष : अजित पवार 

मुंबई : समाजात असहिष्णुता वाढत आहे. महागाईने टोक गाठले आहे. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामुळे कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढते आहे. सरकारचे त्याकडे लक्ष नाही. कोण काय खातंय, कोण काय घालतंय याकडे मात्र यांचे लक्ष असते. गोरक्षक भक्षक बनलेत. जो समोर येईल त्याच्यासोबत मारहाण केली जाते. त्यामुळे भावना भडकवून राजकारण करणाऱ्या अशा लोकांचा बुरखा फाडण्याची वेळ आता आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची राज्य कार्यकारिणीची बैठक आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, निरीक्षक बसवराज पाटील नागराकर, आमदार प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले की, रोहित वेमुला याची आत्महत्या यांच्याच काळात घडली, आंबेडकर भवन यांच्याच काळात पाडले गेले, दलित मुक्त भारत, मुस्लिम मुक्त भारत अशी भाषा कोणी केली याचा विचार कुठे तरी व्हायला हवा. आंबेडकर स्मारकाबाबत सरकारने मोठा गाजावाजा केला. पण मुळात आंबेडकरांच्या स्मारकाची संकल्पना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची होती. या सरकारने स्मारकाचे भूमीपूजन केले पण आज तीन वर्ष झाले सरकार येऊन मात्र अद्यापही स्मारक बांधले गेले नाही. यामुळे आता या स्मारकाच्या विषयासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाकडून पुन्हा आंदोलन छेडले जाईल व त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी त्यांना संपूर्ण पाठिंबा देणार आहे. 

मोदी सरकारच्या काळात मागासवर्गीयांवर हल्ले वाढले. गुजरातमध्ये गरबा बघितला म्हणून दलित तरुणांना ठार मारले. आपला समाज कुठे चाललाय ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. 

रामदास आठवले म्हणतात दलित युवकांनी रम प्यायली पाहीजे. आठवले जबाबदार मंत्री आहेत त्यांनी तरुणांना असे सल्ले देणे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. सरकारविरोधात लोकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद झाल्या. याविरोधात आपण आवाज उठवायलाच हवा, अशी भूमिका अजित पवार यांनी बैठकीत व्यक्त केली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com